शंकरगीता अध्याय १६ वा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:02:04
शंकर गीता अध्याय १६
देखून महाराज प्रत्यक्ष । ज्वलंत महतीची पटे साक्ष
मोक्षार्थियास मिळावा मोक्ष । वंदिता झाला आनंद ।।१।।
अनंताचार्य उंब्रजकर । वैदिक, भिक्षुक सोलापूर ।।
मनात करती विचार । श्रीमंतांचे महाराज ।।२।।
महाराज श्रीमंतांनाच विचारती । माझ्यासम गरिबाकडे न बघती ।।
सोवळ्यात अभिषेकाहून ते परतती । रस्त्यात भेटले महाराज ।।३।।
महाराज म्हणाले ‘चल रे आता’ । महाराज मी सोवळ्यात आता ।।
असुदे, त्यांच्या धरून हाता । स्टेशनवरती आणले ।।४।।
महाराजांनी मुंबईस । नेले अनंताचार्यास ।।
केशवजी आशर घरास । महाराज म्हणाले आशरना ।।५।।
यांना कपडे करावेत । दोन तिकिटे रिझव्र्ह केलीत ।।
आशर महाराजांना सांगत । कालच तिकिटे काढली ।।६।।
अनंताचार्य चकीत होत । सोवळ्यात महाराज मज आणत ।।
आशर मजला कपडे करीत । दोन तिकिटेही काढत ।।७।।
महाराज अनंताचार्यास घेऊन । निघाले विमान - बोटीतून ।।
मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण । रोम, इटली, इंग्लड ।।८।।
वगैरे सर्व देशातून । आणले तीन महिने हिंडवून ।।
पुन्हा सोलापूरात सोडून । महाराज त्यांना म्हणाले ।।९।।
मी श्रीमंतांनाच विचारतो । गरिबाकडे न बघतो ।।
अनंताचार्यास पश्चात्ताप होतो । महाराजांचे चरण धरी ।।१०।।
एकदा नगरला महाराज असत । संध्याकाळची जेवणे होत ।।
भक्तासमवेत गप्पा रंगत । महाराज सतत सांगत ।।११।।
गप्पात रात्र संपली । पहाटेची वेळ झाली ।।
नानासाहेब मिरीकर त्यावेळी । महाराजांना म्हणाले ।।१२।।
तुम्ही कुणास हसविले । तुम्ही कुणास रडविले ।।
तुम्ही जर आहात असले । कसे असतील गुरू तुमचे ? ।।१३।।
ताडकन महाराज उभे गुडघ्यावर । मागे नेला डावा कर ।।
उजवा हात केला ताठ वर । दृष्टी आकाशाकडे ।।१४।।
‘माझे गुरू आहेत असले’ । जोरात महाराज उद्गारले ।।
त्याच स्थितीत तसेच राहिले । दीड तास निश्चल ।।१५।।
महाराजांच्या डोळ्यातून । अश्रूंची धार सतत लागून ।।
कपडे त्यांचे गेले भिजून । भक्त सारे घाबरले ।।१६।।
उगाच प्रश्न विचारला । महाराजांस आपण त्रास दिला ।।
म्हणती ‘क्षमा करावी आम्हाला’ । तेव्हा महाराज म्हणाले ।।१७।।
तुमचे काहीही न चुकले । तुमच्यामुळेच मज गुरू आठवले ।।
तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले । धन्य तुम्ही आहात ।।१८।।
गुरूंचे घेता नुसते नाव । कसा प्रगटावा मनी भाव ।।
केवढी असावी मनाची धाव । प्रत्यक्ष गुरूच दाखवित ।।१९।।
एकोणीसशे एकोणसाठ शनिवारी । जुलै दिनांक चार शिवरात्री ।।
मिरजेचे पंडित यांच्या घरी । रात्री अकरा वाजता ।।२०।।
महाराज प्रत्यक्ष प्रगटून । गादीवरती निजले असून ।।
दोन्ही लोडावर दोन हात ठेवून । पाय तिरपे लांबविले ।।२१।।
तसाच महाराजांचा फोटो काढला । आजही तो मिळतो पहावयाला
समाधीनंतर बारा वर्षांनी भला । प्रसंग आहे घडला हा ।।२२।।
एकोणीसशे बासष्ट साली । महिनाभर अभ्यंकराच्या स्वप्नामधी ।।
महाराज येऊन सांगती । फोटो सर्व जमव मम ।।२३।।
स्टुडिओ सर्वही धुंडाळले । फोटो काहीही न मिळाले ।।
तोच स्वामीसमर्थ स्टुडिओ दिसले । सर्व वृत्तांत निवेदिला ।।२४।।
फोटोग्राफर म्हणाले । फोटो मजपाशी आहेत सगळे ।।
परी महाराजांनी मज सांगितले । फोटो न द्यावे कुणाला ।।२५।।
तुम्ही याल उद्या जर । काय घडले ते पाहू तर ।।
गेले दुस-या दिवशी अभ्यंकर । फोटो मिळाले सर्वही ।।२६।।
अभ्यंकर किंमत विचारत । फोटोग्राफर त्यांना सांगत ।।
महाराज, महाराजांचे फोटो नेत । किंमत कसली यात हो ।।२७।।
पुढे पानशेतच्या धरणात । स्टुडिओ हा वाहून जात ।।
सर्व फोटो ठेविले सुरक्षित । महाराजांनी यापरी ।।२८।।
समाधीनंतर सोळा वर्षांनी । ही घटना आली घडूनी ।।
महाराजांची ऐशी करणी । कल्पनातील असे ही ।।२९।।
लहान मुलांच्या घोळक्यात । महाराज नेहमी रममाण होत ।।
त्यांना प्रेमाने कुरवाळीत, बोलत । आनंदाने खेळत ।।३०।।
लोक महाराजांना विचारीत । तुम्ही कसे खेळता मुलांत ?।।
महाराज त्यांना सांगत । पवित्र, निष्पाप मुले ही ।।३१।।
शुध्द अंत:करण यांचे फार । निरिच्छ यांचे विचार ।।
मागत नाहीत काहीच तर । माझ्यापाशी मुले ही ।।३२।।
तुम्ही सारे स्वार्थापोटी । नेहमी काही मागण्यासाठी ।।
सतत लागता माझ्या पाठी । अप्पलपोटी तुम्ही सारे ।।३३।।
महाराजांच्या या उद्गारात छान । झणझणीत भरले अंजन ।।
कसे असावे अंत:करण । ज्याचे त्याने जाणावे ।।३४।।
महाराज कुठेही बसत । कपड्यावर तंबाखू लाळ गळत ।।
स्वच्छतेचा गंध नसत । कपडे घाणेरडेच ।।३५।।
त्यांचे धोतर असता धूत । गुलाबपुष्पांचा सुगंध येत ।।
जिकडे तिकडे सुगंध सुटत । सौगंधही अपूर्व ।।३६।।
महाराजासं खिचडी आवडत । महाराज स्वत: खिचडी करीत ।।
संपूर्ण कांदे लसून टाकत । ओंजळीत बसतील तेवढे ।।३७।।
खडे मीठ, मिरच्या ओंजळीत घेत । तशाच खिचडीत टाकीत ।।
दिसेल ते तसेच खिचडीत । टाकून होत मोकळे ।।३८।।
सोलणे - निवडणे मुळीच नाही । शिजू लागे पहा खिचडी ।।
खिचडीत हात घालुनी । खिचडी हलवीत जोराने ।।३९।।
झारा - डाव - चमचा - उलथणे । यांची जरुरी कधीच नसणे ।।
पदार्था मोजमापे प्रमाणे । कधीच वापरली नाहीत ।।४०।।
अशी खिचडी मस्त बने । जणू कैलासचीच पक्वान्ने ।।
महाराजांच्या हातचे मिळणे । भाग्य महाराज जाणोत ।।४१।।
दोन्ही चरणे महाराजांची । एकसारखी मुळीच नव्हती ।।
उजवा पाय लहान असूनी । डावा मोठा लांबच ।।४२।।
उजवा पाय महाराजांचा । डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा ।।
चमत्कार हा चरणांचा । स्वाध्याय हवा यावर ।।४३।।
महाराज जेव्हा कुठे बसत । उजवा पाय पुढे असत ।।
डावा पाय मागे असत । सहज बैठक त्यांची ही ।।४४।।
गुरूचरणांचा स्पर्श शिष्यांना । व्हावा, कळतसे ही योजना ।।
दीनोध्दारक कैलासराणा । किती कृपाळू मायाळू ।।४५।।
पुरूषोत्तमबुवा सांगत । महाराज शुभराय मठात येत ।।
माझे कपडे वापरत । मजवर प्रेम अपार ।।४६।।
महाराजांचे सर्वांवर । प्रेम अमाप अपार ।।
महाराजांच्या वास्तव्यात तर । आनंदाचा कल्लोळ ।।४७।।
महाराज मारूतीसमोर बसती । म्हणती मी आहे मारूती
याची सर्वा आली प्रचीती । समाधीच्या वेळेस ।।४८।।
गोविंद जानू गिरमे असत । महाराजांचे एकनिष्ठ भक्त ।।
ते सर्वांस आवर्जून सांगत । महाराज अग्नी केवळ ।।४९।।
रावबहादूर नवले असत । मराठा समाजाचे पुढारी विख्यात ।।
कोल्हापूरी त्यांचा सत्कार होत । भाषणात ते म्हणाले ।।५०।।
केवळ महाराजांच्यामुळे । माझे संपूर्ण परिवर्तन झाले ।।
पुण्यतिथीस भक्त जे जेवले । उच्छिष्ट यांचे सेवित ।।५१।।
तात्या सहस्त्रबुध्दे अन गणेशन । एकमेकांचे पार्टनर असून ।।
रहात दोन खोल्यांतून । दृष्टान्त झाला गणेशनना ।।५२।।
अक्कलकोट स्वामींचा अवतार । सध्या मुंबईत असून तर ।।
दर्शनही त्यांचे मनोहर । गणेशनना जाहले ।।५३।।
दृष्टांत तात्यांना सांगून । निघाला तात्यांना घेऊन ।।
स्वामींचा अवतार पहावा म्हणून । स्वामींचे मठ शोधिले ।।५४।।
एक चित्र, गिरगाव मठात । चित्रकार होता पूर्ण करत ।।
दृष्टांतातील हेच अवतार असत । गणेशन पाहता म्हणाले ।।५५।।
मोटारीतून महाराज येत । चित्र घेऊन महाराज जात ।।
त्याचा पाठलाग करत । माडीत गेले महाराज ।।५६।।
महाराजांनी आपली खोली । कडी लावून बंद केली ।।
हाक मारूनही खोली न उघडली । गणेशन निघून गेलाच ।।५७।।
दार उघडून महाराज म्हणत । तात्या, तुझीच वाट मी पहात ।।
महाराजकृपे तात्यांच्या हातात । पार्थिव पूजा प्रगटली ।।५८।।
तात्यांवर महाराजांनी । अमाप कृपा ती करूनी ।।
सर्वस्व त्यांना अर्पूनी । आपल्यासारखे बनविले ।।५९।।
अगदी महाराजांसारखे । दिसत तात्या सहस्त्रबुध्दे ।।
एकमेकांची सगळी कामे । एकमेक करीत ।।६०।।
तात्यांच्या नोकरीवर महाराज जात । महाराजांची कामे तात्या करत ।।
बरेच दिवस असेच जात । कळले कुणा काही ना ।।६१।।
एकदा तात्यांची बायको खवळत । तेव्हा महाराज तात्यांस म्हणत ।।
आता तुझे काम तू जा करीत । माझे काम मी करतो ।।६२।।
महाराज शुभराय मठात । अष्टमीस देवीच्या नवरात्रात ।।
भारी जरीचे पातळ नेसत । सर्व अलंकार घातले ।।६३।।
मळवट कुंकवाचा भरून । मधुबूवास पालथे निजवून
त्यांच्या पाठीवर उभे राहून । महाराज नाचू लागले ।।६४।।
दशावतारी संगीत नृत्य । महाराजांचे सुरू होत ।।
मधुबूवा भावावस्थेत जात । वादक गेले थकून ।।६५।।
महिषासुरमर्दिंनीचे नृत्य । इतके रंगून गेले असत ।।
वादकांची बोटे रक्ताळत । अपूर्व भयानक नृत्य हे ।।६६।।
महिषासुरमर्दिनी नृत्याचे । फोटो फिल्म घेतले असते ।।
आज उपयुक्त ठरले असते । घडले असते दर्शन ।।६७।।
सुवासिनींची - कुमारिकांची । महाराज पूजा करीत असती ।।
अशी पूजा करावी म्हणूनी । महाराज भक्तां सांगत ।।६८।।
बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत । समाधी - मठावरून असता जात ।।
मठासमोर मोटार बंद पडत । म्हणून गेले मठात ।।६९।।
सिगारेट कोणी ओढत नसत । तरीही सिगारेटचा त्यांना वास येत ।।
बेहरे यांना आश्चर्य वाटत । समाधी समोर गेले ते ।।७०।।
समोर महाराजांचा पुतळा असत । एक भक्त सिगारेट घेऊन येत ।।
महाराजांच्या मुखास लावत । महाराज सिगारेट ओढत ।।७१।।
सिगारेट पेटे, धूर निघे । बेहरे टकमका पाहू लागे ।।
दुस-या दिनी त्यांच्या घरामध्ये । प्रत्यक्ष महाराज प्रगटले ।।७२।।
रामजोशींच्या तमाशात । चिमाबाई नृत्यांगना असत ।।
ती महाराजांच्या दर्शना येत । गुलबी कुत्रीस घेऊन ।।७३।।
महाराज चिमाबाईस सांगत । गुलबी महान व्यक्ती असत
चिमाबाईस हे न पटत । महाराज म्हणाले पहाच ।।७४।।
महाराज गुलबीस बोलवित । गुलबी महाराजांसमोर येत ।।
त्यांना तीन प्रदक्षिणा घालत । मुक्त महाराजपदी हो ।।७५।।
चिमा म्हणाली महाराजांना । तुम्ही गुलबीचा उध्दार केला ।।
माझाही उध्दार करावा । अनुग्रह दिलाच ।।७६।।
चिमाबाईस महाराजस म्हणाले । शुभराय मठ मारुती मंदिरामागे ।।
एक तट बांधून देणे । मान्य केले चिमाने ।।७७।।
तटाचे खोदकाम सुरू होत । त्यातून तीन मूर्ती निघत ।।
नागनाथ - नरसिह - हनुमंत । चकीत झाले सर्वही ।।७८।।
स्थापना हनुमानजयंती दिवशी । केली तिन्हींची महाराजांनी ।।
हाच तटाचा मारुती असूनी । तीन मुर्ती मठात ।।७९।।
महाराज एकदा दारू पीत । रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत ।।
नागेश धनेश्वर समोर असत । दारू चढली नागेशा ।।८०।।
नागेश भडाभड ओकले । महाराज रामचंद्रांना म्हणाले ।।
तुझ्या मुलाने मद्य प्याले । दोष मज का देतोस ? ।।८१।।
महाराजांनी काडी लावली । ओकारी सर्व जळून गेली ।।
अघटित करणी पाहून सगळी । दोघेही थक्क जाहले ।।८२।।
वकील होते रामचंद्र नागेश होते डॉक्टर ।।
हेच डॉक्टर धनेश्वर । महाराजांचे लाडके ।।८३।।
डॉक्टरांची अकरा मुले । मूरणार, महाराजांनी जाणले ।।
महाराजांनी काय हवे विचारले । ते काहीही न बोलले ।।८४।।
डॉक्टर धनेश्वरास । अष्टमहासिध्दी देत ।।
डॉक्टर त्यांचा उपयोग न करत । केवढी तयारी पहा ही ।।८५।।
काय इच्छा महाराज विचारीत । डॉक्टर महाराजांस सांगत ।।
जिथे व्हाल तुम्ही समाधिस्त । तिथेच व्हावा अंत मम ।।८६।।
महाराजांचे एकनिष्ठ । भक्तांत धनेश्वर वरिष्ठ
त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ । महाराजांनी पुरविली ।।८७।।
महाराज धनेश्वरास घेऊन । संगती हार एक आणून ।।
पुणे स्टेशनवर जाऊन । महाराज बसले निवांत ।।८८।।
तेवढ्यात तेथे गाडी आली । हार घेऊन गर्दी उसळली ।।
डब्यातील व्यक्तीस हार घाली । महाराज म्हणाले धनेश्वरा ।।८९।।
जे कृष्णमुर्ती होते डब्यात । सर्वजण त्यांना हार घालत ।।
धनेश्वरही हार घालीत । जे कृष्णमुर्ती म्हणाले ।।९०।।
कुणाचा आहे हा हार । धनेश्वर हात करत बाहेर ।।
महाराजांस पाहता सत्वर । कृष्णमुर्ती उठलेच ।।९१।।
त्यांनी महाराजासं हार घालुनी । परतून डब्यात बसता क्षणी ।।
गाडी गेली निघूनी । तेव्हा महाराज म्हणाले ।।९२।।
निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमुर्ती । जे माझा हार स्वीकारती ।।
मलाही ते हार घालती । घडले कसे पहा हे ।।९३।।
धनेश्वरांच्या मनात । यामुळे शंका उद्भवत ।।
पुढे जेव्हा त्यांची भेट होत । शंका त्यांना विचारली ।।९४।।
जे कृष्णमर्ती त्यांना सांगत । निर्गुणसंप्रदाय आमचा असत ।।
आमच्या संप्रदायाचे गुरू साक्षात् । असती शंकरमहाराज ।।९५।।
रात्री समाधीमठावर । एक सर्पराज करी संचार ।।
लाल प्रकाश पडे प्रखर । मुख त्याच्या लाल असे ।।९६।।
लाल रत्न विशेष असे । त्याच्या प्रकाशात तो फिरतसे ।।
अनेकांनी हे पाहिले असे । शिपाई पाळत ठेवत ।।९७।।
एकदा मध्यरात्र होत । सर्पराज होते हिंडत ।।
बंदुकधारी शिपायांना ते दिसत । प्रकाशामागे धावत ।।९८।।
लाल प्रकाश जिकडे दिसत । शिपाई तिकडे लगेच जात ।।
सर्पराज समाधीवर चढत । अंतर्धान जाहले ।।९९।।
शिपाई मठात शिरत । इथे नाग आला का ? विचारत
कोणास काहीच ठाऊक नसत । शिपाई गेले निघुन ।।१००।।
ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार । ते कोणाला सापडणार ?
त्यांना कोण मारणार ? अगणीत लीला जयांची ।।१०१।।
एकदा मध्यरात्री समाधीवरती । एक नागराज प्रगटती
लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती । बाबुराव रुद्रांनी पाहिले ।।१०२।।
समाधीनंतर दोन वर्षांनी पहा । भाऊसाहेब राऊत यांना
महाराजांनी मंत्र दिला । श्रीस्वामी समर्थ ।।१०३।।
पूर्वी जक्कलच्या मळ्यात । मंडप लहान, बांधलेला नसत
सभोवती उघडे रान असत । संरक्षण नव्हते कसलेच ।।१०४।।
महाराज मारुतीच्या रूपात । तेथे पहारा आहेत करत
क्षणात मारुती, महाराज क्षणात । राम कोराड पहात ।।१०५।।
एकोणीसशे एकोणपन्नासात । बाबुराव रुद्राला महाराज भेटत
हिंदीत त्यांच्याशी बोलत । काव्यपंक्तीच होत्या त्या ।।१०६।।
अगदी खणखणीत आवाजात । वीस चरणी हिंदी दोह्यात
मै कैलासका रहनेवाला हूं । स्पष्ट महाराज म्हणाले ।।१०७।।
शिर महाराज - चरणी टेकवून । साष्टांग नमस्कार घालून ।।
सोळावा अध्याय पावन । पूर्ण येथे जाहला ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.