शंकरगीता अध्याय १५ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:05:31
शंकर गीता अध्याय १५ वा देखून महाराजांचे चरण । भारावून गेलो मी त्यांना शरण पाठीवर माझ्या थाप मारुन । महाराज पाहू लागले ।।१।। थाप बसता पाठीवरती । महाराज कृपेची ही पावती ।। चट्दिशी कळली मजप्रती । आनंद मला वाटला ।।२।। भाग चरित्राचा जो लिहिला । महाराजचरणी रुजू झाला ।। महाराजांना फार आवडला । साक्ष याची मिळाली ।।३।। ज्यांच्या पहा पाठीवर । महाराज थाप मारणार ।। त्यांचे कल्याण होणार । नित्य अनुभवाची गोष्ट ही ।।४।। पेंटर कडलासकरांची प्रमिला । बारामतीस मावशीकडे गेली ।। तेथे भुताने झपाटली । भूत नाचू लागले ।।५।। कधी ती आरडेओरडे । डोळे फिरवी इकडेतिकडे ।। नंतर ती बेशुध्द पडे । घाबरुन गेली मावशी ।।६।। देवर्षी अनेक उपाय केले । सारे अगदी व्यर्थ गेले ।। सोलापुरी तीज आणून सोडले । सांगितले जे घडले ते ।।७।। पेंटर, भस्मेंना म्हणाले । ’माझ्या मुलीस भूत लागले’ ।। ’दाखव देवर्षीस’ भस्मे वदले । पेंटर मनी हादरले ।।८।। आपणच महाराज असताना । इतरत्र हिंडण्याच्या का यातना ? कशास कोणापुढे याचना । महाराज समर्थ असताना ।।९।। ऐसा त्यांनी विचार केला । दुस-या दिवशी एका लग्नाला ।। जावयाचे होते परगावला । पत्नी - कन्येस आधी पाठविले ।।१०।। लग्नास जाऊ लग्नादिवशी । ऐसा विचार करुन मनाशी ।। महाराजांच्या फोटोपाशी । बसले दीप लावून ।।११।। गहिवरुन आले पेंटरना । कळवळून म्हणाले महाराजांना ।। आपण समर्थ असताना । भूत काढणे अशक्य का ? ।।१२।। तुम्हीच माझ्या मुलीला तारा । अथवा तुम्हीच तिला मारा ।। तुमच्या मनास येईल तसे करा । नाव राखा वा बुडवा ।।१३।। ढसढसून पेंटर रडले । महाराजांचे स्तोत्र म्हटले ।। ’गुरुलीलामृत’ पारायण केले । नंतर गेले लग्नास ।।१४।। इकडे व-हाडाच्या गोंधळात । प्रमिला मोठमोठ्याने ओरडत ।। शंक-या मी जाते, मला सोड । मारु नकोस मजला रे ।।१५।। पळत वेशीबाहेर गेली । शंक-या आता चालले रे मी ।। ओरडत बेशुध्द पडली । बाधामुक्त जाहली ।।१६।। गोंधळात झाला गोंधळ । हादरुन गेले व-हाड सकळ ।। तेवढ्यात पेंटर झाले दाखल । आनंद काय वर्णावा ? ।।१७।। हाक ऐकिली महाराजांनी । वृत्त ऐकले सर्वांनी ।। कडलासकर गेले भारावूनी । म्हणाले ’जय शंकर’ ।।१८।। एका बाईचे पाय आखडले । चालणे तिचे बंद झाले ।। तिने साईबाबांस सांगितले । साईबाबा म्हणाले ।।१९।। जा शंकरमहाराजांच्या दर्शनाला । दर्शनास येताच त्या बाईला ।। व्याधिमुक्त झाल्याचा अनुभव आला । बाई अत्यंत हर्षली ।।२०।। उपासनी महाराज साकोरीत । योगिराज, विदेही, सुविख्यात ।। बुवाबाजी खटला कोर्टात । त्यांच्यावरती चालला ।।२१।। काही समाजकंटकांनी । उपासनीमहाराजांस ठरविले भोंदू मुनी गुंतविले त्यांना बूवा प्रकरणी । आनंदले कंटक ।।२२।। नगरचे श्रोत्रीय वकील विख्यात । त्यांना महाराज सांगत ।। तुम्ही ही केस घेऊन हातात । उपासनींना सोडवा ।।२३।। श्रोत्रीय म्हणाले महाराजासं । मी दिवाणी असे वकील ।। क्रिमिनल केस ही असत । कशी चालविता येईल ? ।।२४।। महाराज म्हणाले श्रोत्रीयांस । तूच चालवली पाहिजे ही केस ।। वंदून श्रोत्रियानी महाराजांस । केस तुफान रंगवली ।।२५।। इतकी केस रंगवली । जज्जांची मती गुंग झाली ।। प्रेक्षक मंडळी थक्क झाली । निर्दोष सुटले उपासनी ।।२६।। पाहून श्रोत्री यांची बुध्दिमत्ता । अन् अर्ग्युमेंटची कुशलता ।। दिपून गेले सर्व अवलोकिता । ब्रिटिश सरकार अपार ।।२७।। समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारनी । श्रोत्रीयां चा सत्कार करूनी ।। पदवी बार. अ‍ॅट. लॉ देऊनी । गौरविले श्रोत्रीया ।।२८।। श्रोत्रीयांनी जाणले । अशक्य ते शक्य केले ।। कोर्टात माझे जे भाषण झाले । जाणीव मज मुळी ना ।।२९।। कोर्टात महाराजच बोलत । अशक्य ते शक्य करीत ।। श्रोत्रीय महाराजांचे - चरणे धरत । प्रसन्न झाले महाराज ।।३०।। श्रोत्रीयांस महाराज विचारत । ‘काय तुज माग हवे असत ?’ ।। ‘दत्त पादुका मज मिळाव्यात’ । श्रोत्रीय वदले लगेच ।।३१।। गाणकापुरच्या भस्मात । महाराज हात घालत ।। त्यातून पाषाणपादुका काढत । श्रोत्रीयांना दिल्याच ।।३२।। अजूनही श्रोत्रीयांच्या घरात । दत्तपादुका उत्सव होत ।। महाराज प्रभाव असा असत । अतर्क्य अपूर्व अगाध ।।३३।। शेख अब्दुलरझाक बियाबानी । पोलिस खात्यात पोलीस असूनी ।। धर्माचे ते असती ज्ञानी । पुणे शहरी वास्तव्य ।।३४।। साध्या वेषात बियाबानी । दर्शनास गेले एके दिनी तू पोलीस आहे म्हणूनी । महाराजांनी ओळखले ।।३५।। थक्क झाले बियाबानी । त्यांचा गुरू कोण ? हेही सांगूनी ।। गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी । त्यांना म्हणून दाखवला ।।३६।। चकीत बियाबानी झाले । त्यांनी महाराजांना ओळखले ।। महाराज प्रत्यक्ष अल्ला भले । उद्गार त्यांचे असतीच ।।३७।। महाराजांच्या भव्यत्वाची । माहिती अत्यंत महत्वाची ।। बियाबानी उत्स्फूर्तपणेची । आनंदाने सांगत ।।३८।। मालपाठकांना दर्शन होत । राम कोराड यांच्या रूपात ।। क्षणात राम कोराड दिसत । क्षणात प्रत्यक्ष महाराज ।।३९।। नाना सोनटक्के यांच्या घरात । महाराज एकदा बसले असत ।। एक दाढीवाला संन्यासी येत । महाराजांसमोर उभा तो ।।४०।। सोनटक्क्यांना तो विचारत । महाराज कुठे आहेत ? ।। सोनटक्के तर चकीत होत । पाहून कसा विचारतो ? ।।४१।। संन्यासी तो निघून जात । महाराज सोनटक्क्यांना म्हणत ।। आत्ताच दर्शन द्यावयाचे नसत । संन्याश्याला पहा या ।।४२।। सोनटक्क्यांना महाराज दिसत । न दिसत संन्याशा, जरी ते असत ।। एकाच वेळी या घटना घडत । एकमेकांविरूध्द ।।४३।। महाराज गेले काशीत । ब्राह्मण महाराजांस अवलोकित ।। ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत । असले कसले महाराज ?।।४४।। वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून ।। महाराजांस सांगती ठासून । काहीच करत तुम्ही ना ।।४५।। नाही वैदिक आचार । नाही वैदिक विचार ।। वेदाचे महत्व अपार । तुम्हा ठाऊक मुळी ना ।।४६।। महाराज शांत ऐकून घेत । तिथेच एक मुलगी खेळत ।। सागरगोटे होती झेलत । तिला महाराज पुकारित ।।४७।। त्या मुलीस म्हणाले महाराज । हे भटुकडे जमले इथे आज ।। वेदांचे ज्ञान त्यांना पाज । सांग वेद समजावून ।।४८।। मुलगी अशी बोलत होती । जणू प्रगटला बृहस्पती ।। जिभेवर नाचे सरस्वती । व्यासच जणू बोलत ।।४९।। व्याख्यान तिचे ऐकून । वैदिक सगळे गेले थिजून ।। महाराजांचे चरण धरून । शरण गेले तात्काळ ।।५०।। अकलूज शुगर फॅक्टरीत । दरवर्षी बॉयलर बिघडत ।। जर्मन कंपनीचा मनुष्य येत । नीट करून जातसे ।।५१।। पाच - सहा दिवसात । काम तो पूर्ण करत ।। रोजचा त्याचा पगार असत । एक हजार रूपयेच ।।५२।। इतर खर्च सर्व वेगळे । दरवर्षी असेच चाललेले ।। महाराजांनी हे पाहिले । निष्कारण हा खर्च का ? ।।५३।। महाराज म्हणाले या वर्षी तर । नीट करून देतो हा बॉयलर ।। घण आणून द्या मज सत्वर । महाराज नीट करत ।।५४।। तीन दिवस रात्री बारा नंतर । घणाचे घाव घालून बॉयलर ।। दुरूस्त केला तेव्हापासून तर । बॉयलर नाही बिघडला ।।५५।। वाघोडला जेव्हा महाराज जात । तेव्हा तेथे सुगंध सुटत ।। वाघोडास जेव्हा सुगंध येत । महाराज तेव्हा जात तिथे ।।५६।। महाराज येणे, सुगंध सुटणे । यांचा अन्योन्य संबंध असणे ।। लोक ओळखीत पुरतेपणे । महाराज येणे जाणत ।।५७।। धनराज गिरजीस पैशाचे कोडे । म्हणून आले महाराजांकडे ।। महाराज पैशाशिवाय घोडे नडे । पैसा द्याहो मजलागी ।।५८।। महाराज धनराजास सांगती । पैशानेच समस्या वाढती ।। नाना प्रश्न पैशानेच उद्भवती । पैसा कारण दु:खाचे ।।५९।। पैशाने सुख शांती समाधान । यांच होत असे हवन ।। पैशचा नाद दे सोडून । धनराज काही ऐकेना ।।६०।। महाराजांनी धनराजास । अगदी पुष्कळ दिला त्रास त्रास सोसूनही पैशाची आस । त्याची कमी न जाहली ।।६१।। महाराज गेले त्याच्या घरी । बेफाम पडले आजारी ।। बेडके पडती जमिनीवरती । साठवून ठेवण्या सांगितले ।।६२।। धनराजांनी मोठे घमेले । महाराजांच्या बेडक्यास ठेवले ।। घमेले बेडक्यांनी भरले । महाराज बेडके ओकत ।।६३।। महाराज म्हणाले धनराजास । थुंकी बेडके पिऊन टाक ।। धनराजांनी न करता विचार । पिऊन सर्व टाकले ।।६४।। धनराजास म्हणाले महाराज । आता होशील तू ‘धनराज’ ।। आणि खरोखरच ते बनले धनराज । अपार धन ते मिळाले ।।६५।। काशीक्षेत्रातील एक सावकार । महाराजांचा भक्त फार ।। महाराजांच्या कृपेने सुंदर । कन्यारत्न त्याला जाहले ।।६६। कन्यारत्न सात वर्षाचे झाले । महाराज सावकाराला म्हणाले ।। मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले । विवाह लाव माझ्याशी ।।६७।। सावकारही कबूल झाला । महाराज म्हणाले सावकाराला ।। सांग तशी दौंडी देण्याला । दौंडी पिटविली काशीत ।।६८।। काशीविश्वेश्वराच्या मंदिरात । हा विवाह असे होत ।। प्रचंड जनसमुदाय जमत । जो तो कुजबुजू लागला ।।६९।। मुलगी सात वर्षाची छान । नवरा तर म्हातारा असून ।। कसे आले हे जमून । हसती सारे म्हणून ।।७०।। लग्नघटिका भरली । महाराजांनी तिज वंदन केले ।। आणि तिला आई म्हटले । सावकारास सांगू लागले ।।७१।। या मुलीचे वैधव्य टळत । ही पडेल राजघराण्यात ।। धार संस्थानची तिज मागणी येत । राणी झाली संस्थानची ।।७२।। मुलीचे वैधव्य जाणून । स्वत: लग्नास उभे राहून ।। तिच्याशी लग्नही न करून । वैधव्य मुलीचे टाळले ।।७३।। वैधव्य तिचे टाळून । राजाची राणी तिज बनवून ।। सर्वस्वी केले तिचे कल्याण । लक्षात कुणाच्या येणार ? ।।७४।। माळीनगरच्या शुगर फॅक्ट्ररीत । एकदा महाराज मुद्दाम जात ।। फॅक्टरीचा बॉयलर पाडत । लोक पहात राहिले ।।७५।। गहिनीनाथांच्या महाराजांनी । स्वयंभू पादुका तेथून काढुनी ।। विधियुक्त त्यांची स्थापना करूनी । फॅक्टरी सुरळीत चालली ।।७६।। नगरला जनार्दनबूवांचे कीर्तन । महाराज, श्रोत्यांची दाटी होऊन ।। गोरा कुंभार चालले आख्यान । भलतेच अगदी रंगले ।।७७।। नामदेवाच्या कीर्तनात । पांडुरंग स्वत: नाचत ।। जनार्दनबुवांच्या कीर्तनात । महाराज नाचू लागले ।।७८।। वीणा बुवांच्या हातातून । महाराजांनी हाती घेऊन ।। गोरा कुंभार आख्यान । महाराज सांगू लागले ।।७९।। महाराजांचे कीर्तन इतके रंगले । श्रोते गोरा कुंभार बनले ।। दुस-या दिवशी महाराजांस पूजिले । बसली प्रसाद पंगत ।।८०।। महाराजासं लागून ब्राह्मण । पलीकडे इतर बसले असून ।। माझा बाब्या कोठे म्हणून ? । मधेच महाराज ओरडले ।।८१।। बाबुराव रुद्रांना बसवीत । पलीकडच्या पंक्तीत ।। महाराज रुद्रांना बोलावित । आपल्या पानावर बसविले ।।८२।। दुस-या पानावर महाराज बसत । सुरू जाहली पंगत ।। महाराज सारे ओळखत । पंक्तिप्रपंच ताठा हा ।।८३।। महाराज विचार करती, याचा । उरतवू पंक्तिप्रपंच नक्षा ।। म्हणाले माझ्या घासात हा । केस आला कोठून ? ।।८४।। सर्वांच्याच पहा हातात । केस दिसला घासात ।। पुढे महाराजा रागावून म्हणत । खडा घासात मज लागे ।।८५।। सर्वाच्या तेव्हा घासात । खडा सर्वांना लागत ।। लोक झाले सारे चकित । अघटित हे पाहून ।।८६।। महाराज म्हणाले सर्वांना । सारेच भक्त प्रिय मला गरीब, श्रीमंत, जात, बुरा, भला । भेद मजपाशी नसेच ।।८७।। माझ्या भक्ताचा अपमान । तो माझाच महान अपमान ।। कधी न करणार तो मी सहन । कळले ज्याचे त्यांनाच ।।८८।। पंक्तिप्रपंच करणारे सगळे । महाराजासं शरण आले ।। म्हणाले महाराज आमचे चुकले । क्षमा करावी प्रभुवरा ।।८९।। शुभराय महाराज मठात । एक बेकार हॉल असत ।। भस्मे, बुवा, रूद्र बसत । दादा फुलारी वगैरे ।।९०।। या सर्वांनी ठरविले असत । अध्यक्षपद महाराजांस देत ।। बेकार हॉलचे अध्यक्ष असत । त्रिनेत्रीधारी महाराज ।।९१।। लोडास महाराज बसत । भोवती सारे बसत असत ।। तेवढ्यात महाराज म्हणत । पान - सुपारी काढ बुवा ।।९२।। बुवांचे खिसे रिकामेच असत । बुवा लगेच उभे रहात ।। कोटाच्या खिशात हात घालत । खिसे सर्वही भरलेले ।।९३।। बुवा अगदी चकित होत । खिसे तर सारे रिकामेच असत ।। लगेच पानसुपारीने कसे भरत ? । नवल सर्वां वाटतसे ।।९४।। पान - सुपारी - चुना - कात । तंबाखू सारे भरपूर निघत ।। बुवा सर्व हे मधे ठेवत । बार भरती सर्वही ।।९५।। सर्व पदार्थ हे कुटून । भस्मे महाराजासं देऊन ।। भस्मे काहीच घेत न । देत सर्व महाराजा ।।९६।। फिरावयाला जावयाचे असत । महाराज भस्मेंना बोलावीत ।। त्यांच्या खांद्यावर महाराज बसत । जात फिरण्या नेहमी ।।९७।। भगवान रामचंद्रास हनुमान । आपल्या खांद्यावर बसवून ।। आकाशात करी उड्डाण । तोच प्रसंग इथेही ।।९८।। असेच प्रसंग काही जुने । लेखणीस लिहावे वाटणे ।। परी लेखणीवर काही बंधने । म्हणून एवढे पुरेच ।।९९।। भस्मे यांच्या खांद्यावर बसत । महाराज वजन हलके करत जशी पुष्पमाळ गळ्यात । भक्तास कष्ट देत ना ।।१००।। रुद्र समाधीमठात रहात । एकदा थंडीचे दिवस असत समाधीवर ठेवून हात । कुडकुडत होते थंडीने ।।१०१।। मध्यरात्रीस समाधीतून । महाराज प्रत्यक्ष प्रगटून रुद्रांना कडकडून भेटून । महाराज त्यांना म्हणाले ।।१०२।। बाब्या चल फिरावायला । सर्व देश दाखवतो तुजला बाबुराव म्हणाले महाराजांना । ‘रात्र फार जाहली ’ ।।१०३।। मी असता तुज कसली भीती ? । चरण धर माझे घट्ट अती बाबुराव घट्ट चरणे धरती । हवेतून निघाले महाराज ।।१०४।। जो जो महाराज उंच जाऊ लागले । तो तो बाबुराव म्हणत राहिले माझ्या पोटात ढवळू लागले । सोडा मजला भूवर ।।१०५।। संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा । फिरवून आणले रुद्रांना समाधीवर सोडून त्याच क्षणा । महाराज अंतर्धान पावले ।।१०६।। प्रत्यक्ष महाराज प्रगटले । पृथ्वीप्रदक्षिणे घडवले पुन्हा समाधीवर सोडले । धन्यता रुद्रांची केवढी ? ।।१०७ देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन । भारावून करून नमन ।। पंधराव्या अध्यायाचे लेखन । या ठिकाणी संपले ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.